नवी भरारी कशी घ्याल?
वचन: परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात, ते आपली शक्ती नवी करतील,ते गरुडा सारखे पंखानी वर जातील ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी थकणार नाहीत . यशया ४०:३१.
मनुष्य आपल्या जीवनातील परिस्थितीला समजून घेत असताना अनेक निकष लावतो, अनेक अंगांनी तो जीवनातील घडामोडीना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचे दिवस वाईट असतील तर तो स्वतःला, इतरांना, देवाला अथवा नशिबाला दोष देतो. त्याच्या परिस्थितीचा काही तरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. या साठी तो जगातील त्याचा अनुभव, जगातील तत्वज्ञान, किंवा असे म्हणू जगातील प्रत्येक दृष्टीकोण वापरून त्याच्या परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला काही कळत नाही कारण तो हे जाणून घेण्यास कमी पडतो कि या जगाचा निर्माता चालक मालक जो पिता परमेश्वर आहे त्याच्या इच्छेशिवाय इथे काहीच घडत नाही.आणि जरी हे त्याला कळले तरी देव असे का करतो हे त्याला कळत नाही. पवित्र शास्र सांगते कि देवाचा सल्लागार कोणी होऊ शकत नाही, त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही. मनुष्याच्या देवा विषयीच्या कल्पना हास्यास्पद आहेत.
मानवाने हे समजून घ्यावे कि यहोवा परमेश्वरच खरा देव आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तो सर्वशक्तिमान देव आहे. त्याचा सर्वांवर अधिकार आहे. त्याच्या पासून काही लपत नाही. तो न्यायी देव आहे. त्याने ठरवल्या प्रमाणे तो सर्वांचा न्याय करतो. प्रत्येक गोष्टी साठी त्याने एक समय ठेवला आहे.
यशया संदेष्टा इस्राएलाला देवाचा संदेश देताना प्रश्न विचारतो की, ‘तू असे कसे म्हणतोस कि तुझा देवाला विसर पडला आहे, किंवा तुझा मार्ग व न्याय त्याच्या दृष्टीआड झाला? तुला माहित नाही काय कि तो सनातन देव आहे. तो निर्माता आहे, तो थकत भागत नाही, त्याची बुध्दी अगम्य आहे . तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बळ देतो. तरुण थकतात, भरजवानीतले ठेचा खातात. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, नवीन शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत चालतील तरी थकणार नाहीत. यशया ४०:२७-३१.
जीवन हे चढ उतारांनी भरलेले असते, अनेकदा जीवनातील प्रसंग माणसांना सहन करण्या पलीकडे असतात त्यामुळे मानसिक ताणतणाव येऊन दुबळेपण येते.आश्या परिस्थितीत लोक आत्महत्येचा अगदी टोकाचा विचार करतात. आपल्या देशात अनेक लोक परिस्थिती पुढे हतबल होऊन चुकीचे निर्णय घेतात.परंतु धार्मिक आपली भिस्त पैशावर ठेवत नाही तर देवावर ठेवतो. त्यामुळे तो देवाच्या आशीर्वादाची वाट अगदी धीर धरून पाहतो. देव त्याला नवीन शक्ती सामर्थ्य देऊन त्यांचा मानसिक; शारीरिक दुबळेपणा घालवून नव्या आत्मविश्वासाने आशा प्रकारे भरतो कि पुन्हा त्याच्या प्रगतीचा आलेख कधी खाली येत नाही.
प्रार्थना: प्रभू येशू तुझी कृपा माझ्या साठी रोज नवी होते म्हणून मी तुला धन्यवाद देतो. मला गरुडा प्रमाणे तरुण करतोस,माझा आत्मविश्वास खचू देत नाहीस म्हणून मी तुझे आभार मानतो. परिस्थितीने गांजलेल्या प्रत्येकाला तुझ्या अभिवाचनावर विश्वास ठेवण्यास कृपापुरव, त्यांना संजीवित करून पुन्हा उभे कर. येशूच्या नावाने मागतो,आमेन
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.