वचन: माझ्या धन्या, आमचे ऐक, आम्हांमध्ये तू देवाचा अधिपती आहेस. आमच्या कबरस्थानातल्या निवडक कबरेत तू आपल्या मृताला पुरावे म्हणून आमच्यापैकी कोणीही आपली कबर तुझ्या पासून राखून ठेवणार नाही. उत्पत्ती २३:६
अब्राहाम कनान देशात उपरी असे जीवन जगत होता. उपरी ह्याचा अर्थ
आश्रित होतो. असा व्यक्ती स्थानिक लोकांत दुय्यम समजला जातो. परंतु अब्राहमचा जीवनपट पहिला तर असे लक्षात येते की तो कनान देशात अतिशय प्रभावी जीवन जगला, व इतपत वाढला की राज्यांनी त्याचा मानसन्मान केला, इतकेच नव्हे तर त्याच्या संगती राजाशी करावेत असे शांतीचे करार त्यांनी केले. तेथील लोकांनी तर त्याला देवाचा अधिपती व त्यांचा स्वामी असे संबोधले. हे
आश्चर्यकारक वाटत असले तरी सत्य आहे अब्राहामाच्या बाबतीत व आपल्या बाबतीतही, फक्त ते समजून घेण्याची गरज आहे.
आपले राजपण कसे ओळखावे: अब्राहामाचे जीवन आम्हाला आपल्या जीवनाचा दर्जा ओळखण्यास मदत करते.मानवाच्या उद्धारासाठी देवाने आपणाला निवडले आहे. या जगात आपण राजासारखे आहोत. ते कसे
हे आपण येथे समजावून घेऊ.
अ) आपली निवड :देवाने अब्राहामाला निवडीले, वेगळे केले ते पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करण्यासाठी. हा त्याचा राज्याभिषेक
होता. जगात राजाची निवड होताना त्याचा राज्याभिषेक करत. हा अभिषेक त्याला जणिव करून देत असे की आता तो स्वतः पुरता किंवा कटुंबा पुरता
मर्यादित नाही तर राज्यातील सर्व जनतेसाठी त्याचे जीवन आहे.थोडक्यात राज्यातील मानवांच्या सेवेसाठी त्याची निवड केली जात असे.
देवाने आपली निवड केली आहे. हि निवड आपण राजाप्रमाणे जीवन जगावे हेच दाखवते. परंतु आपल्या हे लक्ष्यात येत नाही कारण जगिक राजाचे चित्र आपल्या
डोळ्या समोर खूपच वेगळे आहे. त्याची वांशिक उंची, प्रचंड धन संपत्ती, सैन्य सामर्थ्य व जनतेवरील त्याचे अनिर्बंध नियंत्रण म्हणजे राजपण हे आपण समजतो. हे
सगळे बौध्दिक चातुर्य व बळ वापरून मिळवले जाते. हे सर्व पाहता आपण स्वतःला राजाच्या रूपात पाहणे हे विडंबन केल्या सारखे वाटते. परंतु हे लक्ष्यात घेतले पाहिजे की सर्व सत्ताधीश देव, सर्व समर्थदेव, सर्वांपेक्षा श्रेष्ठ व सनातन देव, सर्वांचा निर्माता, चालक आणि मालक देव जेव्हा आपली निवड करतो हि निवडच आमचे अभिषिक्त राजपण सिद्ध करण्यास पुरेशी आहे. अब्राहाम कनान देशात उपरी होता. त्याच्या हाती कुठली सत्ता तर सोडा पण पाय ठेवायला
स्वतःची जागा नव्हती. तरी परराष्ट्रीय लोक त्याला स्वामी व देवाचा अधिपती (राजा) असे पहात होते ते त्याच्या निवडीमुळेच.
ब) आपल्या जीवनातील देवाचे सामर्थ्य: देव ज्याला निवडतो त्याच्या संगती सदैव राहतो. अब्राहामाने भीतीपोटी
दोन वेळेस त्याची पत्नी सारा हिच्या विषयी दोनदा लबाडी केली. ती त्याची बहीण आहे असे त्याने सांगितले कारण तिच्या मुळे लोक त्याला मारून टाकतील असे वाटले. त्याचा परिणाम मिसरचा राजा फारो याने तिला पत्नी बनवण्यासाठी नेले तेव्हा देवाने त्याला ताडन केले व त्याची पत्नी सारा हिचे रक्षण केले. त्या नंतर गराराचा राजा अबीमलेख ह्याच्या बाबतीतही असेच घडले. देवाने पावलापावलावर अब्राहामाचे रक्षण केले, त्याला प्रत्येक कामात यश दिले त्यामुळे त्याचा प्रभाव वाढत गेला. एक सर्वसामान्य उपरी माणूस
आपल्या थोडक्या साथीदारांसह चार राज्यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव कसा करू शकतो ?यावरून सिध्द होते की जरी तो सर्वसामान्य जीवन जगत होता तरी जगातील राज्यांपेक्षा देवाने त्याला अधिक सामर्थ्य दिले होते . त्याच्या या असामान्य जीवनाकडे पाहून ,
देव त्याच्या बरोबर आहे हे या परराष्ट्रीय लोकांनी ओळखले होते. त्याचे सामर्थ्य इतके वाढले होते कि राजे येऊन त्याच्याशी शांतीचा करार करीत. त्यांना भीती वाटे कि न जाणो त्यांच्या हातून अब्राहामा विषयी काही चूक होईल व त्यामुळे त्यांचे जीवन शापित होईल.उत्पत्ती २१:२२–२३.
क) आपल्या विषयी देवाचे अभिवचन :
देवाने अब्राहामाला अभिवचन दिले आहे की,”मी तुला फार सफळ करीन, तुझ्या पासून राष्ट्रें हि निर्माण करीन, आणि राजे तुझ्यापासून जन्मास येतील“. उत्पत्ती १७:६. देवाचे वचन सांगते की,”ज्या प्रमाणे अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला न्यायीपण असे गणण्यात आले, तसे हे आहे तर यावरून तुम्ही जाणा कि जे विश्वासाचे आहेत तेच अब्राहामाचे संतान आहेत“. आपण येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे म्हणून आपणच
अब्राहामाचे आत्मिक संतान आहोत, त्याच्यापासून जन्मास आलेले अभिषिक्त राजे आहोत.
राजा म्हणून कसे वागावे:देवाने आपल्याला या जगात राज्या प्रमाणे निवडले आहे परंतु जगिक राज्यांप्रमाणे अनिर्बंध सत्ता चालवण्या साठी नाही तर देवाच्या अधीन राहून नम्रपणे त्याची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण करण्यासाठी आपले राजपण आहे त्यात दिखाऊपणा मुळीच नाही. तर देवाच्या पाचारणाला शोभेल असे पवित्र जीवन आहे. जेव्हा आम्ही आमच्या चांगल्या कृत्यांनी देवाचे गौरव करू तेव्हा प्रत्येक पावलावर त्याचे सामर्थ्य प्रगट होत राहील व आपल्यातील राजपण जगाला प्रगट होत राहील. त्यासाठी काही गोष्टी आपण अब्राहामाच्या जीवनातून पाहू.
अ) आपले आज्ञापालन : पवित्र शास्त्राप्रमाणे राजाने देवाच्या मार्गदर्शनानुसार राज्य केले पाहिजे. देव आज्ञेचे पालन करणे हे राजाचे प्रथम कर्तव्य आहे. देवाने अब्राहामाची निवड केली व त्याला त्याचे पितृगृह सोडून तो दाखवील तसे मार्गक्रमण करण्याची आज्ञा केली.
तेथे जगिक राजाला प्राप्त असणाऱ्या वैभवांपैकी काहीच नव्हते. होता तो फक्त विस्तीर्ण भूप्रदेश. कोठे जायचे काय व कसे साध्य करायचे काहीही माहिती नव्हते. एकच माहित होते कि सर्व समर्थ देवाने त्याला विशेष कार्यासाठी निवडले आहे. आणि तेच त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे होते. देवाच्या वचनावर विश्वास ठेवत त्याने देवाच्या प्रत्येक आज्ञेचे पालन केले. आज्ञापालनामध्ये तो इतपत वाढत गेला कि आपला एकुलता एक पुत्र देखील त्याने त्याच्या पासून राखून ठेवला नाही.
आपल्या जीवनात स्वतःला राजाच्या रूपात पाहण्या सारखे काहीच नाही. आहे ती फक्त विपरीत परिस्थिती. तरी अब्राहामा प्रमाणे देवाच्या निवडीला उस्साहाने प्रदिसाद देणे व देव आज्ञेचे पालन करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपले राजवैभव भौतिक गोष्टीनं मध्ये नाही ; तर देवाने दिलेल्या अभिवचनात आहे .
ब) आपली साक्ष: अब्राहामाने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेऊन
चालण्याचे ठरवले होते तो अगदी
सामान्य जीवन जगत होता, पण देव त्याची उत्तरोत्तर उन्नती करीत होता तो आणि त्याच्या संगती आलेला लोट दोघेही भौतिक संपत्तीने खूप वाढले तेव्हा त्यांच्यात पशुधनाच्या संगोपनवरून वाद उपस्थित झाला असता अब्राहाम जगिक साधन सामुग्रीला तुच्छ लेखत त्याचा आप्त लोट याला हवा तो प्रदेश निवडण्याची मोकळिकता देतो व स्वतः ला देव इच्छेला समर्पित करितो. उत्पत्ती १३:५–९.
स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी त्याच्या मध्ये कुठेच आक्रमक वृत्ती आढळत नाही. त्याने खणलेल्या विहिरींवर जेव्हा स्थानिक लोक दावा करत तेव्हा तो त्यांच्याबरोबर वादविवाद करत नाही तर त्या विहिरी त्यांच्या
हाती सोपवून तो नव्या विहिरी खणीत असे. स्थानिक लोकांना न दुखावता त्यांच्यात तो संयमाने व भिऊन वागत असे. तरी त्याची समृद्धी व प्रत्येक गोष्टीत त्याला मिळत असलेले यश पाहून स्थानिकांवर त्याचा प्रभाव सातत्याने वाढत गेला.
अब्राहाम अतिशय संयमी, शांत व सरळमार्गी जीवन जगत होता तरी प्रसंगी आपल्या प्रियजणांसाठी व न्यायासाठी जोखीम उचलणारा होता. त्याचा आप्त लोट याला आक्रमक राजांनी जेव्हा बंदी बनवून नेले तेव्हा त्याने लोटाचे भूतकाळातील त्यांच्याबरोबरचे वागणे लक्षात न घेता, तो आपल्या मोजक्या साथीदारांसमवेत आक्रमक राजांच्या विशाल सैन्यावर तुटून पडला व सर्व राजांचा एकत्रित पराभव करून आपल्या आप्तांची सुटका केली. तेव्हा त्याला मिळालेल्या लुटीतून त्याने काहीही घेतले नाही उलट त्याला समोरा येणारा शालेमचा राजा
मलकीसदेक जो परात्पर देवाचा
याजक होता त्याला सर्व लुटीचा दशमांश दिला व सदोमच्या राजाला सर्वकाही
देऊन टाकले. उत्पत्ती १४:१३–२४.
अब्राहामाने देवदूतांचा पाहुणचार केला खरा,पण ते देवदूत आहेत हे त्याला माहित नव्हते ते
त्याचे नेहमीचे वागणे होते.
तो सर्वांच्या
मदतीला सतत धावून जात असे म्हणून तेथील जनतेला त्याला
आधारवड, स्वामी व त्यांच्यातील देवाचा अधिपती असे त्याला मानत होती .
अब्राहाम, देव व मानव यांच्यात मध्यस्थ असा वागला. जेव्हा त्याला समजले कि देव कशा
प्रकारे सदोम व गमोरा यांचा नाश करणार आहे तेव्हा त्याने त्या राष्ट्रांसाठी देवाकडे मध्यस्थी केली.
देवाने निवडलेला व्यक्ती अभिषिक्त राजाच असतो परंतु अब्राहामाप्रमाणे त्याचे जीवन निरुपद्रवी परंतु जनहितासाठी व देव कार्यासाठी समर्पित असते.
क) आपले आराधनेचे जीवन: जेथे जेथे देवाने अब्राहामाला दर्शन दिले, आशीर्वाद दिला, तेथे त्याने देवाची वेदी बांधून त्याची भक्ती केली. उत्पत्ती १२;८, १३:१८, दावीद राजा देवाचा उत्तम आराधक होता हे आपल्याला माहित आहे. जर देवाने आमची निवड केली आहे तर त्याच्या संगती चालताना आपले
जीवन त्याच्या उपकारस्तुतीने भरून जाते. देवाने निवडलेला राजा त्याचा निःस्सीम
भक्त असतो.
सारांश: सारा वयाच्या १२७ व्या वर्षी हेब्रोन येथे मरण पावली असता . हेताच्या संतानाकडून मयातला पुरण्यासाठी जागा मिळावी म्हणून अब्राहामाने त्यांना विनंती केली. तेव्हा हेताच्या संतानांची प्रतिक्रिया त्याच्या प्रति अतिशय
निष्ठा व्यक्त करणारी होती. ते त्याला स्वामी देवाचा अधिपती त्यांचा
राजा असे संबोधितात. हेताच्या संतानांनी अब्राहामाचा सन्मान केला त्याला उपरेपणाची जाणीव होऊ दिली नाही अथवा कोणतेच उणेपण भासू दिले नाही उलट राजच्या शब्दाला मान द्यावा असा अब्राहामाच्या शब्दाला मान दिला.
हीच साक्ष आज पर्यंत अनेक ख्रिस्ती सेवकांच्या जीवनातून दिसून आली. देव त्यांच्या बरोबर होता म्हणून ते वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जाऊन देवाची सेवा करू शकले. प्रभू येशू म्हणतो तुम्ही पृथ्वीचे मीठ व प्रकाश आहात. तुमची चांगली कामे पाहून आकाशातील बापाचे गौरव व्हावे. मत्तय ५:१३–१६ .देवाने
समेटाची सेवा आपल्याकडे दिली आहे, प्रत्येक वंश, राष्ट्र, जाती जमाती यांना आम्हाला ख्रिस्ताच्या प्रितीने स्पर्श करायचा आहे. त्यासाठी अब्राहामाप्रमाणे देवा बरोबर चालणारे जीवन आम्ही जगावे. जगात आम्ही देवाचे प्रतिनिधी असे ओळखले जावे. देवाने निवडीलेंले असे आम्ही पृथ्वीवर मानवाच्या उद्धारासाठी अभिषिक्त राजे आहोत.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू जसा अब्राहामा बरोबर होतास तसा माझ्याही बरोबर आहेस मला माझ्या जीवनातून तुझे गौरव प्रगट करता यावे म्हणून माझे सहाय्य हो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक . आमेन.
रेव्ह कैलास साठे