वचन: आणि त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन तिला म्हटले, आमच्या बहिणी तू हजारो लाखोंची आई हो, आणि तुझे संतान आपला द्वेष करणाऱ्यांची वेस हस्तगत करो. उत्पत्ती २४:६०.
![]() |
“तू फलद्रुप हो”. |
रिबका अब्राहामाच्या चाकरा बरोबर निघाली असता तिच्या कुटूंबियांनी वरील आशीर्वाद तिला दिला. हा आशीर्वाद खूपच प्रेरणादायी आहे. तुझे संतान हजारो लाखोच्या संख्येत वाढो. आणि तुझे संतान आपला द्वेष करणाऱ्यांची वेस हस्तगत करो.चला तर
मग जाणून घेऊया की रिबकाला तिच्या आई वडिलांनी व थोरामोठ्यांनी हा आशीर्वाद का दिला.
कौटुंबिक व सामाजिक गरज : रिबकाला तिच्या कुटूंबियांनी हा आशीर्वाद
का दिला असा विचार केल्यास त्याचे गुपित त्या काळच्या समाज व्यवस्थेमध्ये असल्याचे आपल्या लक्ष्यात येईल.
त्या काळात संख्या म्हणजे; “मसल पॉवर” हि मसल पॉवर त्या काळी आजच्या पेक्ष्या खूप अधिक महत्वाची होती. जे लोक संख्येने जास्त ते इतरांवर वर्चस्व गाजवत असत. त्या काळात कायदा व सुव्यवस्था आजच्या सारखी प्रगत नव्हती त्यामुळे संख्येच्या व एकजुटीच्या जोरावर अनेक लोक समूह एकमेकांना लुटत व यात मोठी जीवित हानी होत असे. आशा स्थितीत शक्ती सामर्थ्याने, धैर्याने व एकजुटीने लढण्याची क्षमता असणाऱ्या समाजलाच स्थैर्य व समृध्दी प्राप्त होत असे.
न्याय्य सामाजिक व्यवस्थेची गरज : रिबकाला आशीर्वाद देताना त्यांनी पुढे म्हटले कि, तुझे संतान आपला द्वेष करणाऱ्यांची वेस हस्तगत करो. येथे एक गोष्ट लक्षात घ्या हा आशीर्वाद शांती प्रिय व न्याय प्रिय समाजाची अपेक्षा करतो, येथे वेस हस्तगत करण्याची भाषा वापरली आहे पण ती इतरांना लुटण्यासाठी किंवा इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी नाही तर जे तुमच्यावर आक्रमण करतील, जे तुमचा द्वेष करून तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला गुलाम बनवू इच्छितील अशा तुमच्या शत्रूला तुम्ही धडा शिकवण्या इतपत प्रबळ असावे अशा अर्थाचा हा आशीर्वाद आहे.
देवाने तुमच्या पोटी राजकन्या व राजपुत्र दिले आहेत: आज तुमचा कमालीचा द्वेष करणारे, तुमच्या प्रगतीला रोखण्याचा प्रयत्न करणारे, तुम्हाला पुन्हा गुलामगिरीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या आजूबाजूला आहेत का? याचे उत्तर होय असो किंवा नाही असो, पण तुम्ही न्यायप्रिय, बलशाली, एकजिन्सी व प्रगत समाजाची अपेक्षा करणारे व त्या साठी झटणारे नक्कीच असायला हवे. आमची लेकरे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय अशा सर्वच पातळ्यांवर आशीर्वादित असावीत. न्यायप्रिय समाज निर्मिती केवळ आपणच करू शकतो कारण देवाने आम्हाला पृथ्वीचे मीठ, प्रकाश, व पुढारी होण्याचा आशीर्वाद दिला आहे मत्तय ५:१३–१६..देवाचे अभिवचन आहे कि, “परमेश्वर तुला तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील” अनुवाद २८:१३, आज आपली सामाजिक, आर्थिक अथवा राजकीय पार्श्वभूमी लक्षात न घेता, आपण देवाचे लोक आहोत त्याची पवित्र प्रजा आहोत हे लक्षात घ्यावे. १ पेत्र २:९.-१०. म्हणून आपल्या लेकरात सामर्थ्याची पेरणी करण्यात आपण कुठेच कमी पडू नये. आपल्या लेकरांकडे पहाताना मी उद्याच्या राजाला वा राणीला पहात आहे असे पहावे. कारण देवाने आपल्याला मस्तक होण्याचा आशीर्वाद दिला आहे तेव्हा आपणही तोच आशीर्वाद आपल्या लेकरास द्यावा. आपल्याला मुलगा असो अथवा मुलगी देव त्यांचा उपयोग त्याच्या गौरवासाठी व त्याच्या लोकांच्या कल्याणासाठी करून घेऊ शकतो हे आपण विसरू नये.
आपल्या मुखात देवाने सामर्थ्य स्थापित केले आहे: आपल्याला वाटू शकते की, आपण शब्द बोलल्याने काय होईल परंतु तसे नाही आपल्या आतून जे शब्द बाहेर पडतात त्यात सामर्थ्य असते. देवाचे वचन सांगते की,”तू बाळकें व तान्हुली ह्यांच्या मुखानें सामर्थ्य स्थापीत केले आहे; तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा आहे ह्यांना कुंठीत करावे म्हणून म्हणून तू असे केले आहे“. स्तोत्र ८:२
त्यामुळे आपल्या मुखातून निघणारे शब्द कार्यकारी असतात. आपल्या लेकरांविषयी कधीच नकारात्मक बोलू नका, तर नेहमी आदर व सन्मान देऊन
त्यांच्याशी संवाद साधा. ते चुकले तर तुम्ही त्यांना आई वडील किंवा थोर म्हणून शिक्षा करू शकता, पण वाईट बोलू नका. देवाने तुमच्यासाठी, कुटुंबासाठी व समाजासाठी आशीर्वाद म्हणून त्यांना तुमच्या पोटी जन्मास घातले आहे .
प्रार्थना: हे प्रभू येशू तुझ्या लेकरांनी त्यांच्या लेकरांना आशीर्वाद द्यावा असे होऊ दे. जसा तू आमच्यावर रोज कृपावंत होऊन आम्हाला आशीर्वाद देतोस तसेच आम्हीही आमच्या लेकरांसाठी असावे अशी ज्ञान बुद्धी आम्हाला दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून माझी प्रार्थना ऐक, आमेन.
रेव्ह. कैलास (आलिशा) साठे