वचन: नियमशास्त्र मोशेच्या द्वारे दिले होते; कृपा व सत्य येशूच्या द्वारे आली. योहान १:१७.
मनुष्याने आज्ञाभंग केल्या नंतर तो देवाच्या सहभागितेला मुकला. त्यामुळे ज्ञान, सामर्थ्य, आरोग्य, यश, शांती, आनंद, हे जे सर्व त्याच्या ठायी देवाने ठवले होते ते त्याच्या पासून निघून गेले. पुन्हा ते गौरव व सामर्थ्य आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून मनुष्य झटू लागला. निर्माण कर्त्याने जे काढून घेतले ते निर्मिती त्याच्या इच्छे शिवाय मिळवू शकत नाही हे तो समजू शकला नाही, कारण त्याच्या ठायी पाप कार्य करू लागले होते. त्यामुळे गर्विष्ट होऊन दैवी सामर्थ्य प्राप्त करण्याचे प्रयत्न करू लागला, यातूनच कर्मकांड, तत्वज्ञान, नियमबद्ध जीवन, आशा अनेक आत्मिक मार्गाची निर्मिती मानवाने केली उद्देश एकच कि मला देवाप्रमाणे सामर्थ्यशाली व्हायचे आहे. तो आता पूर्णपणे विसरला होता कि देवाने त्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले होते व त्याच्या सह्भागीतेच्या सामर्थ्यामुळे त्याला देवाचे गौरव व सामर्थ्य प्राप्त होते. या अवस्थे मध्ये सैतानाने त्याला अधिक अंधारात ढकलले व अनेक अनिष्ट रूढी, प्रथा, व कर्मकांडाची निर्मिती होत गेली. परंतु यातून पाशच निर्माण झाले. सैतानाच्या या पाशातून मनुष्याला सोडवण्यासाठी देवाने एक योजना केली. उत्पत्ती ३:१५ , १२:१–३. त्याला मनुष्याला समजावून सांगावयाचे होते कि हे मानवा तुला माझे पूर्वीचे सामर्थ्य व गौरव मिळवायचे असेल तर तुला कर्मकांडाची नाही तर माझी गरज आहे. त्यासाठी त्याने आब्राहामाची निवड केली त्याच्या पासून मोठे राष्ट्र निर्माण केले. त्या राष्ट्राला मिसर देशात जगातील पापमय व्यवस्थेचा अनुभव दिला, नंतर त्यांना गुलामीतून मुक्त करून मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिले जे जगातील कर्मकांडाचे प्रतीक होते. हे सर्व यासाठी केले कि मानवाला नियमशास्त्राचे ओझे व निष्फलता समजावी व येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाशी संयुक्त होण्याचे महत्व समजावे.रोम ७:७–१३. आदामाच्या आज्ञाभंगामुळे आपण देवाचे सानिध्य मुकलो होतो पण देवाच्या कृपेमुळे येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपला निर्माणकर्त्याशी पुन्हा समेट झाला व पूर्वीच्या गौरवा कडे आपली वाटचाल सुरु झाली आहे, रोम ५:१०–११.
कृपा व सत्य येशूच्या द्वारे आम्हाला प्राप्त झाली याचा नेमका अर्थ आपण समजून घेतला तरच आपण ख्रिस्ती जीवनाचे महत्व समजू शकतो.
प्रार्थना: हे देवा प्रभू येशू ख्रिस्ता साठी मी तुला धन्यवाद देतो, आता पवित्र जीवन जगण्यास मला साहाय्य कर. कृपा व सत्याची हि सुवार्ता अनेकांना कळू दे व जगात आनंद, शांती, व प्रीती नांदूदे.येशूच्यानावाने, आमेन.
रेव्ह.कैलास [अलिशा ] साठे
वचन: द्राक्षरस बनलेले पाणी जेंव्हा भोजन कारभाऱ्याने चाखले, तो द्राक्षरस कोठला आहे हे त्याला माहित नव्हते पण पाणी काढणाऱ्या चाकरांना माहित होते. योहान २:९.
लग्न समारंभात लोक काहीच उणे सहन करीत नाहीत. या लग्नात तर मुख्य पदार्थ म्हणजे द्राक्षरस संपला होता. आशा वेळी वधू वराच्या कुटुंबीयांची नामुष्की अटळ होती. परंतु जेथे येशू ख्रिस्त उपस्थित असतो. तेथे कोणावरही दुःखी किंवा लज्जित होण्याची वेळ येत नाही. त्याने पाण्याचे रांजण भरण्यास सांगितले व त्या पाण्याचा उत्तम द्राक्षरस झाला. व या कुटुंबियांच्या चिंतेला आनंदामध्ये परावर्तित केले.
आज अनेक लोक वेगवेगळ्या चिंता काळज्यांनी त्रस्त आहेत. त्यांचे जीवन त्यांना असाहय झाले आहे. ते सुटकेची वाट पाहत आहेत. ते लज्जित होऊ नयेत त्यांचे दुःख आनंदामध्ये परावर्तित व्हावे म्हणून त्यांच्या पर्यंत आम्हाला ख्रिस्तला घेऊन गेले पाहिजे, ख्रिस्ताचे सामर्थ्य आजही त्यांच्या परिस्थितीत अलौकिक परिवर्तन घडवून आणू शकते व त्यांच्या विपरीत परिस्थितीला आनंदामध्ये बदलू शकते.
प्रार्थना: हे प्रभू येशू मी तुझे आभार मानतो कि तू मला पृथ्वीवर तुझ्या नामाचे सामर्थ्य प्रगट करण्यासाठी ठेवले आहे. जे दुःखी कष्टी आहेत त्याना तुझ्या नावाच्या सामर्थ्याने बंधमुक्त करण्यासाठी मला कृपा पुरव. येशूच्या नावाने मागतो आमेन.
रेव्ह.कैलास [अलिशा]साठे .