वचन: आणि इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला, तेव्हा त्याने आपले डोळे वर करून पहिले, तो पहा उंट येत आहेत. उत्पत्ती २४:६३.
वरील वचनावर चिंतन मनन करत असताना मी आपले लक्ष इसहाक च्या शिस्तबद्ध जीवनाकडे वेधू इच्छितो. अगदी अलीकडच्या काळापर्यंत चे ग्रामीण जीवन पाहिले तर असे लक्षात येते कि संध्याकाळ म्हणजे दिवसभराच्या कामातून निवृत्त होण्याची वेळ, विसावण्याची वेळ. इसहाक या वेळेला एकांतात जाऊन ध्यान करायचा हि गोष्ट त्याचे शिस्तबध्द जीवन प्रगट करते. तो कशाप्रकारे ध्यान लावत असेल हे आपल्याला माहित नाही . पण आपण विचार करू शकतो कि तो संध्याकाळच्यावेळी एकांतात जाऊन शांत बसून मनावरील ताण कमी करत असावा. देवाबरोबर शांत ठिकाणी प्रार्थने द्वारे संवाद साधत असावा, धन्यवाद देत असावा, त्याचे मार्गदर्शन घेत असावा. काहीही असो पण एक मात्र नक्की कि तो त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व अध्यात्मिक स्वास्थाकडे गांभीर्याने पाहणारा होता.
आज आपण इसहाक च्या तुलनेत हजारो पट अधिक ताण सहन करत आहोत. असे म्हटले तर वावगे होणार नाही. आमचा दिवसभराचा कार्यभार रात्री उशिरा पर्यंत संपत नाही.
जीवघेणी स्पर्धा, भविष्याविषयी चिंता काळज्या, त्यात सकस आहार तर सोडाच पण देवाने दिलेला ऑक्सिजन देखील या वायुप्रदूषणामुळे शुध्द राहिला नाही. व या सर्वावर कळस म्हणजे जोरदार ध्वनिप्रदूषण जे चोवीस तास अखंड चालू आहे. या सर्वांचा परिणाम आमच्या शारीरिक, मानसिक, व बौद्धिक अरोग्यावर होत आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात व जीवन वरदान कि ओझे असा प्रश्न पडतो . हळूहळू कार्यशक्ती नष्ट होते, जीवनातील आनंद आपण गमावून बसतो. काही लोकांकडे पैसा खूप येतो पण त्याचा उपभोग घेता येत नाही काहीतरी खूप मोठे काळाच्या ओघात आपण गमावून बसलेलो असतो. म्हणून जीवन निरंकुश होऊ नये; यासाठी दिवसात काय चांगले वाईट केले त्याचा विचार करा, आपले मन देवापुढे मोकळे करा व दुसऱ्या दिवसासाठी मार्गदर्शन मागा. स्वतः देवाने सृष्टी निर्मितीच्या वेळी रोजच्या कामाचा आढावा घेतला व सातव्या दिवशी पूर्ण विसावा घेतला व आम्हालाही शारीरिक मानसिक विसावा मिळावा म्हणून प्रत्येक शनिवारी सक्तीचा लॉक डाऊन दिला, ज्याला आपण शब्बाथ दिवस म्हणतो.
सकाळी लवकर उठून स्वच्छता करणे, आंघोळ करून देवाच्या चरणाजवळ बसून दिवसभराचा कार्यभार त्याच्या हाती सोपवावा व नंतर दिवसाच्या कामकाजाची सुरुवात करावी. शक्यतो शांत चित्ताने काम करीत रहावे, अपकाराने काहीही साध्य करू नये. देवाची पवित्रता आम्हाला प्राप्त आहे म्हणून पवित्र जीवनाला अनुसरावे. संध्याकाळी जरी काम पूर्ण झाले नाही तरी दिवसभराच्या कार्यभारातून रिक्त व्हावे, व शांत ठिकाणी जाऊन पुन्हा देवाची भेट घ्यावी.
अमेरिके सारख्या प्रगत देशात शनिवार व रविवार असे दोन दिवस विश्रांतीसाठी व देवाबरोबर संवाद साधण्यासाठी दिले आहेत. अर्थात लोक त्याचा उपयोग कसा करतात हा चिंतनाचा भाग आहे. पण आपण जर इसहाक च्या शिस्तबद्ध जीवनाचे अनुकरण करू तर अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक विकारांपासून वाचू व आपले जीवन सुख शांती आणि आनंदाने भरलेले असेल.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू सुध्दा पृथ्वीवर असताना देव पित्या बरोबर रोज एकांतात जाऊन बोलायचा. मी सुद्धा रोज तुझ्याशी शांत वेळी बोलू इच्छितो. रोज माझे मार्गदर्शन कर म्हणजे मी तणाव मुक्त जीवन जगेन. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक . आमेन.
रेव्ह. कैलास (आलिशा ) साठे